Saturday, January 30, 2016

भारत आणि अमेरिका

भारत आणि अमेरिका यांतील संबंध बघूया...



      जगातील सर्वात जुनी लोकशाही असलेली अमेरिका आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला भारत या दोन्ही देशांमधील संबंध शीतयुद्ध काळामध्ये अनेक प्रश्नांवरून तणावपूर्ण होते. दोन्ही देशांचा जागतिक राजकारणाकडे बघण्याचा दृष्टीकोन भिन्न होता. भारत हा आदर्शवादी दृष्टीकोनातून जागतीक राजकारणाकडे बघतहोता तर अमेरिका हा हितसंबंधांच्या आणि  वास्तववादी दृष्टीकोनातून जगाच्या राजकारणाकडे बघत होता. दृष्टीकोन वेगवेगळा असला तरी दोघांमध्ये शत्रुत्व नव्हते म्हणजे संबंध ताणले गेलेले होते,पण तुटलेले नव्हते. भारताच्या अलिप्ततावादी धोरणाबाबत अमेरिकेला अनेक आक्षेप होते. दुसरीकडे भारताचा कल हा अमेरिकेपेक्षा रशियाकडे अधिक होता.त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंधाच्या विकासाला फारसा वाव मिळालेला नव्हता. १९७१ मध्ये भारतीय उपखंडात राजकीय परिस्थिती धोक्याच्या वळणावर येऊन पोहचली होती एका बाजूला पाकिस्तानने आक्रमण केले होते आणिअंतर्गत राजकारणात पंतप्रधानांना राजकीय संकटांना तोंड द्यावे लागत होते. पाकिस्तानला अमेरिकेने मोठ्या प्रमाणावर लष्करी व आर्थिक सहाय्य केले; अश्या परिस्थितीत भारताने आत्मरक्षणाचा उपाय म्हणून भारताला सोव्हिएत युनियन सोबत सहकार्याचा करार करावा लागला. भारत-पाकिस्तान युद्धावेळी अमेरिकेसारख्या जागतिक महासत्तेनेही भारतावर दडपण आणण्याचे प्रयत्न केले; परंतु इंदिरा गांधी यांनी अमेरिकेच्या या प्रयत्नांना जराही भिक न घालता आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणत्याही परकीय सत्तेच्या दडपणाखाली न येता आपले स्वतंत्र धोरण आखण्याचे साहस इंदिरा गांधी यांनी दाखवले.

पुढेशीतयुद्धाचा शेवट झाला आणि दोन्ही देशांमधील संबंधांच्या एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. १९९१ नंतर पी.व्ही.नरसिंह राव यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत  दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यास सुरुवात झाली याचे प्रमुख कारण भारतीय परराष्ट्र धोरणामध्ये घडून आलेले बदल...

यातील पहिला बदल म्हणजे, भारताच्या आर्थिक उदारीकरणाच्या धोरणाचा परिणाम परराष्ट्र धोरणावर झालेला होता. भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये आर्थिक आणि व्यापारी संबंधांना महत्व प्राप्त झाले होते. त्याचबरोबर पाकिस्तान सोबत अमेरिकेची जवळीक हे सुद्धा प्रमुख कारण होते. दुसरा बदल म्हणजे संपूर्ण दक्षिण आशिया मधील काही नवीन प्रवाह विकसित झाले होते. यामध्ये अण्वस्त्रीकरणाचा प्रवाह हा महत्वाचा होता. १९९८मध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश हि अण्वस्त्रधारी बनले. त्याच बरोबर त्या काळात दहशतवादासारखा प्रश्न हि गंभीर बनू लागला होता. चीन चा आक्रमकतावादहि या काळात वाढला होता या सर्वांमधून भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये सहकार्यासाठी एक वाव निर्माण झाला होता.

काही मुद्दे असे आहेत ज्या बाबत या दोन्ही देशांमध्ये हितसंबंधांमध्ये परस्पर व्यापकता आहे. या हितसंबंधाच्या परस्पर व्यापकते मधूनच दोन्ही देशांचे संबंध घनिष्ट होण्यास सुरुवात झाली.यामध्ये सर्वात महत्वाचे योगदान तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी दिले.

नंतरचे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी देखील अमेरिकेसोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्यावर भर दिला..भारत अमेरिका अणुसहकार्य करार हा आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वात महत्वाचा निर्णय त्यांनी घेतला.

सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये अमेरिकेला भेट देऊन तेथील भारतीयांना भारतामध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. या दौऱ्यात त्यांनी‘जन-मुत्सद्देगिरी’चे एक उदाहरणच जगासमोर ठेवले. यांनतर राष्ट्रप्रमुखांना आपल्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलावून हे संबंध अधिकच वृद्धींगत केले.




वैभव सुरेश कातकाडे
एम जे एम सी
के टी एच एम कॉलेज
 

भारत आणि संयुक्त राष्ट्रे

भारत आणि संयुक्त राष्ट्रे यांतील संबंध बघुया..



पहिल्या महायुद्धाच्या भीषण संहारानंतर व्हर्साय च्या तहवर भारताने स्वाक्षरी केली.  इ स १९२० मध्ये आंतरराष्ट्रीय शांततेच्या प्रश्नाला चालना देण्यासाठी राष्ट्रसंघ( league of nations) ही संघटना स्थापन करण्यात आली, राष्ट्रराष्ट्रांमधील संबंध सुधारने, आंतरराष्ट्रीय क्षेत्रात सामंजस्याचे वातावरण प्रस्थापित करने ही या संघटना स्थापन करण्यामागची काही उद्दिष्टे होती.

भारत हा राष्ट्रसंघाचा सुरुवतीपासूनच सदस्य राहिला होता. राष्ट्रसंघाचे सदस्यत्व मिळाल्याने आंतरराष्ट्रीय समुदयातील एक प्रमुख घटक म्हणुन भारताला मान्यता मिळाली. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आणि आंतरराष्ट्रीय न्यायालय या आंतरराष्ट्रीय संघटनांचे सदस्यत्वही भारताने स्वीकारले. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचा सदस्य या नात्याने भारताने महत्वपूर्ण योगदान केले होते. भारताच्या प्रतिनिधींनी भारतीय कामगार वर्गाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी या संघटनेच्या व्यासपीठाचा चांगल्या प्रकारे उपयोग करून घेतला.

पुढे दुसऱ्या महयुद्धानंतर 'संयुक्त राष्ट्रे' ही नवी आंतरराष्ट्रीय संघटना इ.स.१९४५ मध्ये स्थापन करण्यात आली. अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे भरलेल्या परिषदेमध्ये संयुक्त राष्ट्राची स्थापना करण्यासंबंधीचा अंतिम निर्णय घेण्यात आला.भारत या परिषदेत सहभागी झाला होता; तसेच संयुक्त राष्ट्रांचा संस्थापक सदस्य या नात्याने भारताने संयुक्त राष्ट्राच्या सनदेवर स्वाक्षरीही केली होती,यावरून स्वतंत्र्यपूर्व काळापासूनच भारताचा निरनिराळ्या आंतरराष्ट्रीय संघटनांशी कसा संबंध आला होता हे स्पष्ट होते. भारताने आंतरराष्ट्रीय संघटनांचा नेहमी आदर केला आहे. या संघटनांच्या प्रतिष्ठेचे रक्षण जले पाहिजे अशी भारताची भूमिका राहिली आहे. भारताच्या या  भूमिकेला स्वातंत्र्यपूर्व काळापासून आंतरराष्ट्रीय संघटनांशी प्रस्थापित झालेल्या त्याच्या संबंधांची पार्श्वभूमी लाभली आहे.
 
 भारताने नेहमी संयुक्त राष्ट्रसंघात शांतिसेनेची महत्वपूर्ण भूमिका पार पडली आहे. आपले सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रसंघाच्या आमसभेत हिंदी म्हणजे आपल्या राष्ट्र्भाषेत भाषण केले. राष्ट्र्भाषेत भाषण  करणारे ते दूसरे पंतप्रधान आहेत. पाहिले पंतप्रधान मा. अटल बिहारी वाजपेयी होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याचे आवाहन संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठावरुण केले. या आवाहनचे सर्वच स्तरावरून स्वागत करण्यात आले. २१ जून रोजी जगभरात हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. २१ जून २०१५ रोजी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून तसेच आम सभेचे अध्यक्ष सॅम पित्रोदा हे अमेरिकेतील मेडिसन स्क़्वेअर येथे उपस्थित राहून हा कार्यक्रम साजरा केला यावेळी आर्ट ऑफ़ लिव्हींग चे सर्वे सर्वा श्री श्री रविशंकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

 संयुक्त राष्ट्रसंघाचे स्थायी सदस्यत्व मिळविण्यासाठी भारताचे जोरजोरदार प्रयत्न चालू आहे. यासाठी अमेरिका आणि रशिया यांनी पाठिंबा देण्याचे जाहिर केले आहे. आपल्या देशाने शांतिसेने मध्ये केलेले कार्य तसेच जगात शांतता नांदावी म्हणून केलेले प्रयत्न बघता लवकरच आपला देश संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेवर आपले स्थान निर्माण करू शकतो.

वैभव सुरेश कातकाडे
एम जे एम सी
के टी एच एम कॉलेज

Saturday, January 23, 2016

भारत आणि म्यानमार संबंध...

भारत आणि म्यानमार संबंध बघूया….  

पूर्वी ब्रम्ह्देश या नावाने ओळखला जात असलेला आणि सद्यस्थितीत त्याचे म्यानमार असे नामकरण झाले आहे. हा देश आपल्या पूर्वेला आहे. त्याचे क्षेत्रफळ सहा लक्ष शहात्तर हजार चौ.कि.मी. असून त्याची लोकसंख्या चार कोटी अठ्ठ्यात्तर लाख आहे. आग्नेय आशियातील इतर कोणत्याही देशाची सीमा भारताला लागून नाही फक्त म्यानमार आणि भारत यांच्या सीमा परस्परांना लागून आहे; त्यामुळेच म्यानमार व भारत यांच्यात पूर्वीपासून संबंध चालत आले आहे.

ब्रिटिशांनी ब्रम्ह्देशावर नियंत्रण प्रस्थापित केल्यावर तो देश ब्रिटीश साम्राज्याचा एक भाग असलेल्या भारताला जोडण्यात आला. अशा प्रकारे ब्रम्हदेश भारताचा भाग बनला. आणि त्या देशाचे प्रशासन भारताकडून चालवले जावू लागले. कालांतराने इ.स.१९३५ च्या कायद्यान्वये ब्रम्ह्देश भारतापासून वगळा करण्यात आला आणि १९३७ पासून त्याचे प्रशासन स्वतंत्रपणे चालवले जाऊ लागले. या काळात परस्पर देशांचे नागरिक व्यापार आणि व्यवसायाच्या निमित्ताने परस्पर देशात स्थायिक झाले.परिणामी दोन्ही देशात सांस्कृतिक संबंध प्रस्थापित जाहले.

भारतातील बौद्ध धर्माचा प्रसार आग्नेय आशियातील अनेक देशात आला. म्यानमारमध्ये देखील प्राचीन काळात बौद्ध धर्माचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला. आज देखील या देशात बौद्ध धर्माचे लोक जास्त प्रमाणात आढळतात. या धर्मामुळे दोन्ही देशात सांस्कृतिक नाते जोडले गेले आहे.

४ जानेवारी १९४८ रोजी म्यानमार राजकीय दृष्ट्या स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यानंतर भारत आणि म्यानमार मध्ये खऱ्या अर्थाने राजनैतिक संबंध प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली, या दोन्ही देशांमध्ये भरपूर प्रमाणात साम्य आहे. हे देश निकटचे शेजारी असल्याने त्यांत पूर्वीपासून राजकीय, सांस्कृतिक, आणि व्यापारी संबंध चालत आहेत. दोन्ही देशांना साधारणपणे एकाच काळात स्वतंत्र मिळाले असल्याने सुरुवातीच्या काही कालखंडात दोन्ही देशांचे परराष्ट्र संबंध जवळपास सारखेच आहेत,

या दोन्ही देशांनी साम्राज्यवाद आणि वसाहतवादाला विरोध केला. जगातून साम्राज्यवाद आणि वसाहतवाद यांचे उच्चाटन झाले पाहिजे असा आग्रह या देशांनी धरला होता. आतंरराष्ट्रीय समुदायातील अनेक राष्ट्रांनी या धोरणाला पाठींबा दर्शवला होता. परिणामी विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जगातून साम्राज्यवाद व वसाहतवाद यांचे उच्चाटन झाले. 

पंचशील तत्वांचा पुरस्कार तसेच अलीप्ततावादाचा पुरस्कार हि प्रमुख साम्ये म्हणता येतील. अमेरिका आणि सोव्हिएत युनियन या दोन जागतिक महासत्तांपैकी कोणत्याही एका बाजूला न झुकण्याचे धोरण या राष्ट्रांनी ठेवले होते. १९५५ च्या बाडुंग परिषदेत म्यानमार ने पंचशील तत्वांना पूर्ण पाठींबा दिला होता.

भारत आणि म्यानमार यांच्या वरिष्ठ आधिकाऱ्यांमध्ये ऑक्टोबर २००५ मध्ये झालेल्या बैठकीत अमली पदार्थ, तस्करी, चोरता व्यापार यांवर बंधने घालण्याचे एकमत तयार झाले.


वैभव सुरेश कातकाडे
एम जे एम सी
के टी एच एम कॉलेज

Wednesday, January 13, 2016

भारताचे परराष्ट्र संबंध...

ब्लॉग लिहिण्यासाठी प्रस्तुत विषय घेऊन पहिल्या ब्लॉग मध्ये परराष्ट्र संबंध म्हणजे काय? तसेच भारतीय परराष्ट्र संबंधाचे स्वरूप याचा आढावा घेऊ.
 सध्याच्या काळात आंतरराष्ट्रीय समुदायातील प्रत्येक राष्ट्र इतर राष्ट्रांशी वेगवेगळ्या प्रकारचे संबंध करणे स्वाभाविक बनले आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे जगातील कोणतेही राष्ट्र स्वयंपूर्ण नाही आणि पृथ्वीच्या भौगोलिक परिस्थितीमुळे स्वयंपूर्ण होऊही शकत नाही.प्रत्येक राष्ट्राच्या गरजा अनेकविध स्वरूपाच्या असतात आणि त्याच्याकडील उपलब्ध संसाधनांच्या जोरावर त्यास आपल्या सर्व गरजांची पूर्तता करणे शक्य नसते. अशा परिस्थितीत प्रत्येक राष्ट्राला आंतरराष्ट्रीय समुदायातील अन्य काही राष्ट्राचे सहकार्य घेणे भाग पडते.
एखाद्या राष्ट्राने इतर राष्ट्रांशी संबंध प्रस्थापित करताना त्याविषयीची काही मुलभूत तत्वे सांभाळायला हवी तसेच हे संबंध प्रस्थापित करण्यासाठी निश्चित केलेल्या तत्वांना आणि धोरणांना त्या राष्ट्राचे परराष्ट्र धोरण असे म्हणतात. प्रत्येक राष्ट्र आपल्या राष्ट्रीय हितसंबंधांना सर्वोच्च प्राधान्य देतो. आपल्या राष्ट्रीय हितसंबंधांचे रक्षण आणि वृद्धी करणे हे त्याचे अंतिम ध्येय असते. ह्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी राष्ट्र कितीही किंमत मोजायला तयार असते.राष्ट्रीय हितसंबंध जपण्यासाठी अथवा साध्य करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायातील राष्ट्रे आंतरराष्ट्रीय राजकारणात उतरतात आणि परस्परांशी निरनिराळ्या प्रकारचे संबंध प्रस्थापित करतात.
    
राज्याचे परराष्ट्र धोरण ठरविण्यासंबंधीचे निर्णय घेण्याचे घटनात्मक अधिकार सरकारला मिळालेले असतात तरी परराष्ट्र धोरणाच्या निर्धारणात बाकी अनेक घटकांचा समावेश असतो. भौगोलिक परिस्थिती, ऐतिहासिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी,लोकसंख्या,नैसर्गिक साधनसंपत्ती,लष्करी सामर्थ्य,औद्योगिक प्रगती,विचारप्रणाली,प्रसारमाध्यमे हे त्यापैकी क्काही महत्वाचे घटक होत. आधुनिक काळात लोकशाहीकरणाच्या प्रक्रियेमुळे परराष्ट्र धोरणाच्या संदर्भातही लीक्मातला महत्व प्राप्त झाले आहे. राष्ट्रीय धोरण आणि परराष्ट्र धोरण यात सुसंगती असते. या दोन्हीही बाबी एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात; त्यामुळे यांत विसंवाद असून चालत नाही.
आपला भारत देश हा देखील आंतरराष्ट्रीय समुदायाचा एक घटक आहे. आपल्या देशालाही आंतरराष्ट्रीय समुदायातील इतर राष्ट्रांशी वेगवेगळ्या प्रकारचे संबंध प्रस्थापित करावे लागतात. जगातील इतर देशांप्रमाणे आपल्या देशाचेही निश्चित असे असे परराष्ट्र धोरण आहे आणि राष्ट्रीय सरकार त्या धोरणाचा सातत्याने पाठपुरावा करीत आले आहे.
आपल्या देशाचे भौगोलिक स्थान लक्षात घेता त्यास आशिया खंडाचे मध्यवर्ती स्वरूप प्राप्त झाले आहे. पश्चिम आशिया आणि पूर्व तसेच आग्नेय आशिया यांना जोडणारा दुवा असे भारताचे वर्णन होऊ शकेल.प्राचीन काळात सुद्धा भारत व्यापाराचे एक महत्वाचे केंद्र म्हणून ओळखला जात होता.याशिवाय सांस्कृतिक देवाणघेवाणीचे केंद्र म्हणून म्हणूनही भारताकडे बघितले जात होते.हिंदी महासागरातील एक प्रनुख देश म्हणून भारताचे आंतरराष्ट्रीय राजकारणात एक अढळ स्थान आहे.

वैभव सुरेश कातकाडे.. 
(एम. जे. एम. सी. )
प्रथम वर्ष