Wednesday, February 17, 2016

भारत आणि नेपाळ



 भारत आणि नेपाळ यांतील संबंध आपण बघू

 हिमालयाच्या पायथ्याशी वसलेला नेपाळ हा देश भारताच्या उत्तर दिशेला आहे. हिमालयाच्या प्रमुख पर्वतरांगेच्या दक्षिण उतारावर असलेला हा देश आहे. भारत देशाचा अत्यंत निकटचा शेजारी म्हणून प्रस्तुत देशांच्या द्विपक्षीय संबंधांना विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

उभय देश अगदी पूर्वीपासूनच विविध नात्यांनी एकमेकांशी जोडले गेले आहेत. भारताचे नेपाळसोबत भौगोलिक सांस्कृतिक ऐतिहासिक धार्मिक आर्थिक अश्या अनेक प्रकारचे संबंध चालत आले आहे. भौगोलिकदृष्ट्या भारत व नेपाळ एकाच प्रादेशिक क्षेत्राचे भाग आहेत. भानेपाळ आणि चीन भारताचा उत्तर दिशेने हिमालयापर्यंत असलेला विस्तारित भाग म्हणजे नेपाळ होय. दोन्ही देशांत हिदू हाच प्रमुख धर्म आहे. बौद्ध धर्मामुळे दोन्ही देश परस्परांना जोडले गेले आहेत.

नेपाळ हा भू-वेष्टित असा देश आहे. त्याच्या उत्तरेला चीनचा प्रदेश असून इतर सर्व बाजूंनी भारताचा प्रदेश आहे. चीन आणि नेपाळ यांदरम्यान हिमालयीन पर्वतरांग असल्याने दळणवळणच्या दृष्टीने उत्तरेकडील बाजूचा फारसा उपयोग होण्यासारखी परिस्थिती नाही. याचा अर्थ असा कि, नेपाळशी फक्त भारतीय प्रदेशांमधूनच संपर्क ठेवला जाऊ शकतो तसेच नेपाळचा बाह्य जगाशी संपर्क हा फक्त भारतातूनच होऊ शकतो. नेपाळचा आर्थिक विकास हा बहुतांशी भारतावरच अवलंबून असतो. नेपाळच्या दृष्टीने असलेले हे महत्व त्यांच्या राज्यकर्त्यांना फार चांगल्या प्रकारे ठाऊक आहे म्हणूनच म्हणूनच त्यांनी भारतासोबत मैत्रीचे संबंध टिकवून ठेवले आहेत.

 भारताच्या दृष्टीनेही नेपाळला विशेष महत्व आहे. भारत व नेपाळ यांच्यामध्ये पूर्वापार चालत आलेले घनिष्ठ संबंध हे याचे कारण आहे. भारत व चीन या दोन्ही भविष्यातील महासत्तांदरम्यान असलेला हा देश बफर स्टेट म्हणून वेळोवेळी महत्वाचा ठरला आहे. भारताच्या संरक्षक गरजा नेपाळशीही निगडीत झालेल्या आहेत. नेपाळला राजकीय स्थैर्य लाभावे यासाठी भारत नेहमी प्रयत्नशील असतो. भारतानेही नेपाळशी मैत्रीपूर्ण व घनिष्ठ संबंध प्रस्थापित करण्यास नेहमीच महत्व दिले आहे.

सन १९५० मध्ये दोन्ही देशाच्या प्रमुखांनी एका करारावर स्वाक्षरी केली या करारान्वये दोन्ही देशांनी परस्परांचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व यांस मान्यता दिली आणि परस्परांच्या राष्ट्रीय सुरक्षिततेशी संबंधित असलेल्या बाबींवर परस्पर विचारविनिमय करण्याची तयारी दर्शविली. भारत व नेपाळ यांची राष्ट्रीय सुरक्षितता परस्परांशी निगडीत आहे या वस्तुस्थितीचा स्वीकार दोन्ही देशांनी केला असल्याचे या करारावरून स्पष्ट होते. या कराराला “शांतता व मैत्री करार” म्हणून ओळखले जाते.

 भारत आणि नेपाळ यांतील संबंधांमध्ये १९६० नंतर काहीसा तणाव उत्पन्न झाला. त्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे नेपाळमधील सत्तापरिवर्तन होय. नेपाळमधील बी.पी.कोईराला यांच्या प्रतिनिधीक सरकारने भारतासोबत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यास प्राधान्य दिले होते पण ते सरकार बरखास्त झाल्यानंतर नव्या सरकाने कोईराला सरकारच्या धोरणात महत्वपूर्ण बदल घडवून आणला. आणि याचाच परिणाम दोन्ही देशांच्या संबंधांवर झाला.

पुढे १९७७ मध्ये भारतात सत्तांतर होऊन जनता पक्ष अधिकारावर आला. जनता पक्षाच्या राजवटीच्या काळात भारत-नेपाळ संबंधात थोडा तणाव उत्पन्न झाला. त्यास नेपाळमधील राजकीय परिस्थिती कारणीभूत झाली होती. भारतातील जनता पक्षाच्या नेत्यांनी अनेक वेळा नेपाळमधील कॉंग्रेसच्या नेत्यांविषयी सहानुभूती जाहीररीत्या व्यक्त केली. त्यामुळे नेपाळ मधील सत्ताधारी नाराज झाले आणि याचे पर्यवसान पुढे तणावात झाले. तरीही भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी नेपाळी नेत्याची समजुत काढून तणावाबाबत तोडगा काढला.


सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळविषयी खास भूमिका घेऊन शपथविधीच्या कार्यक्रमात त्यांच्या प्रमुखांना आमंत्रित केले आणि नवा अध्याय रचला. २०१५ मध्ये झालेला भीषण भूकंपामुळे झालेले नुकसान भरू काढण्यासाठी भारताने आर्थिक सामाजिक मदत केली आणि शेजारधर्म पाळला. 

वैभव सुरेश कातकाडे 

एम जे एम सी

के टी एच एम कॉलेज

No comments:

Post a Comment